अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपची माघार!

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे. यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल अपक्ष म्हणूनही निवडणुकीला उभे राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

यामुळे दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले होते.

अंधेरी पोटनिवडणूक लढवावी की बिनविरोध करावी, यावरून भाजपमध्ये एकमत होत नव्हते. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपमध्ये दोन भिन्न मतप्रवाह असल्याचे आता आले. निवडणूक लढवण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार व भाजपचे उमेदवार मुरजी पटेल आग्रही होते. परंतू या निवडणुकीत पराभव झाल्यास आगामी मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसेल व मुंबई पालिकेतील भाजपची पतच जाईल, असे स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितल्याची माहिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीबाबत विचार करावा, असे देवेंद्र फडणवीसांचे म्हणणे होते.

यामुळे या पोटनिवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय भाजपचे केंद्रीय नेतृत्वच घेणार होते. त्यानुसार आता अंधेरी पोटनिवडणुकीच्या रिंगणातून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेतली आहे.

सगळ्याच गोष्टी उघडपणे सांगता येत नाही, पोटनिवडणूक माघारीबद्दल फडणवीसांचे वक्तव्य

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाचाच विजय होईल याची पूर्ण खात्री होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनंती केली की निवडणूक लढवू नका. या दोघांनी जाहीरपणे केली काहींनी मागून विनंती केली. त्यामुळे सगळयांशी चर्चा करून भाजपाने या निवडणुकीत माघारीचा निर्णय घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात आमच्याकडे बराच खल झाला. कार्यकर्त्यांचे तसेच मुंबई विभागाचेही मत होते की निवडणूक लढलीच पाहिजे. मुरजी पटेल तर अपक्ष होते तेव्हा देखील त्यांनी ४५ हजार मते घेतली होती. त्यामुळे विजयाची पूर्ण खात्री होतीच. मात्र राज ठाकरे, शरद पवार यांनी समोरून विनंती केली. काहींनी मागून विनंती केली. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर या आधी देखील आर.आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या निधनानंतर देखील आम्ही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी पत्करून आम्ही अंधेरीतही उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पराभवाला घाबरून आम्ही माघार घेतली असे आता काही जण म्हणत आहेत. मुळात यात तथ्य नाही. आजच्या ग्रामपंचायत निवडणुकांनी अशांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.