कोणाच्याही कोंबड्याने दिवस उजाडला तरी माझी हरकत नाही, पवारांचा नेमका निशाणा कोणावर ?

मुंबई ,१७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाबद्दल भाजपचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कोणाच्याही कोंबड्याने दिवस उजाडला तरी माझी हरकत नाही, असे सूचक विधानही शरद पवारांनी यावेळी केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मी मुरजी पटेल यांनी उमेदवारी मागे घेण्याची मागणी केलेली नाही. मी फक्त भाजपला तसे सुचवले होते. सुचवल्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, याची खात्री होती. एकदा निर्णय झाला की मी त्याच्या खोलात जात नाही. त्यामुळे आता त्यावर अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असे शरद पवार म्हणाले.

भाजपने अर्ज मागे घेतला आहे. पण त्याचे श्रेय ते राज ठाकरेंना देत आहेत. याबाबत पवारांना विचारले असता, पवारांनी मिश्किल भाष्य केले. कोणाच्याही कोंबड्याने दिवस उजाडला तरी माझी हरकत नाही असे पवार म्हणाले.