सीट बेल्ट नसल्यास कडक कारवाई होणार

मुंबई : मुंबईत आता दुचाकीवरील सहप्रवाशाच्या हेल्मेट सक्तीपाठोपाठ चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. चार चाकी वाहनांमधून प्रवास करताना चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. याबाबतचे निवेदन मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.

निवेदनात मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, मोटर कार चालवणाऱ्या सर्व ड्रायव्हर्सना आणि प्रवाशांना सीटबेल्ट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोटर व्हेईकल सुधारणा कायदा, २०१९ च्या १९४ ब (१) नुसार, चालकांना आणि प्रवाशी विना सीटबेल्ट शिक्षेस पात्र होऊ शकतात. ज्या वाहनांमध्ये प्रवाशांसाठी सीटबेल्टची सुविधा नाही त्यांनी १ नोव्हेंबरपर्यंत हे सीटबेल्ट बसवून घ्यावेत. अन्यथा त्यानंतर मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ कलम १९४ (ब) (१) अन्वये कारवाई करण्यात येईल.

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारला महिन्याभरापूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातावेळी मिस्त्री यांनी सीट बेल्ट न लावल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तपासात ही बाब निष्पन्न झाली होती. यापार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढे भारतीय वाहनांमध्ये सहा एअरबॅग्ज आणि चालकासह सर्व प्रवाशांना सीटबेल्ट लावणे बंधनकारक असल्याची घोषणा केली होती.