शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन औरंगाबाद जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार- नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय

औरंगाबाद,१४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे अनुदान आदींसह शेतकरी आत्महत्या रोखणे, पर्यटन विकास, जागतिक पातळीवर पैठणी, हिमरू आणि बिद्री कलेची निर्यात आदींवर लक्ष केंद्रीत करणार तसेच शासकीय योजनाची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे  नवनियुक्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय म्हणाले.

मावळते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून  जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज श्री.पांडेय यांनी पदभार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते.जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविणे. ग्रामीण भागाचा विकास करणे, यावर  विशेष लक्ष राहणार आहे. सर्वसामान्यांना अपेक्ष‍ित असणारे हक्काचे जिल्हाधिकारी म्हणून सामान्य नागरिकांच्या सर्व समस्या सोडवणुकीसाठी प्राधान्य राहणार असल्याचेही श्री. पांडेय म्हणाले. रखडलेले उपक्रम, योजना, प्रश्न मार्गी लावण्यासाठी  प्रयत्नपूर्वक कार्य करून या प्रकल्पांना गती देणार असल्याचेही ते म्हणाले.   यासह औरंगाबाद शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करणे, नवीन पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणे, स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामे, खाम आणि सुकना नदीचे पुनर्जीवन करणे, पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास करणे,  जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी जनजागृतीवर भर देणे,  या रोगावर नियंत्रण यावे, त्याचा प्रसार होणार नाही यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे, पर्यटनासह उद्योग विकासाला चालना देण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेण्यावर भर देऊन जिल्ह्याचा विकास करणार असल्याचे श्री. पांडेय  यांनी आवर्जून सां‍गितले.

औरंगाबाद जिल्ह्याचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार श्री. पांडेय यांनी घेण्यापूर्वी अकोला, बीड या ठिकाणीही ते जिल्हाधिकारी होते. तसेच 2019 ते 2022 या कालावधीत औरंगाबाद महानगर पालिकेंतर्गत त्यांनी  वि‍विध विकासकामे, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केलेले आहे.