हसतमुख, दिलदार, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली

मुंबई, दि. 14 : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे दूरदृष्टीचे नेते होते. संकटांवर मात करुन यशस्वी होण्याचं कौशल्य त्यांच्याकडे होते. लोकांच्या भल्यासाठी चाकोरीबाहेरचे निर्णय घेण्याचं साहस त्यांनी अनेकदा दाखवलं. अमोघ वक्तृत्वं आणि हजरजबाबीपणाच्या बळावर त्यांनी विरोधकांना नामोहरम केलं, परंतु कुणाचा अवमान, अनादर कधी केला नाही. हसतमुख, दिलदार, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची आणि इथल्या राजकारणाची उंची वाढवण्याचं काम स्वर्गीय देशमुख साहेबांनी केलं. राजकारणात वैचारिक विरोध केला, परंतु वैयक्तिक मैत्री कायम जपली. स्वकर्तृत्वावर मोठे झालेले ते नेते होते. युवकांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास होता. त्यांनी नेतृत्वाची नवी पिढी निर्माण केली. युवकांच्या हातात महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल आहे, असं मानणारे ते नेते होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीतलं त्यांचं योगदान खूप मोठं आहे, त्यासाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं स्मरण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *