‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला सेवेत आल्यानंतर सहाव्या दिवशीच अपघात

अहमदाबाद:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात सुरु झालेल्या ‘वंदे भारत’ या एक्स्प्रेसला अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सेवेत आल्यानंतर सहाव्याच दिवशी ही दुर्घटना घडली आहे. गुजरातमधील मणिनगर येथे वंदे भारत एक्सप्रेसला अपघात झाला आहे. या अपघातात ‘वंदे भारत एक्सप्रेस’ गाडीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. संबंधित गाडी गांधीनगरहून मुंबईकडे येत असताना काही जनावरे रुळ ओलांडल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या गाडीचा पुढील भाग खराब झाला असला तरी रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. आज (गुरुवारी) सकाळी साडेअकराच्या सुमारास वटवा ते मणिनगर दरम्यान हा अपघात झाला. ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणारी सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन ताशी 200 किमी वेगाने धावते. त्यामुळे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास प्रवाशांना यामुळे मोठ्या प्रमाणावर सोपा झाला आहे.