पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑक्टोबर रोजी 5G सेवेचा शुभारंभ

नवी दिल्ली ,३० सप्टेंबर  /प्रतिनिधी :- तंत्रज्ञानाच्या नव्या युगात भारत  प्रवेश करत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानात 5G सेवेचा शुभारंभ करतील. 5G तंत्रज्ञानामार्फत चांगले कव्हरेज, जास्त डेटा, कमी विलंब आणि अत्यंत विश्वासार्ह संवाद सुविधा प्राप्त होणार आहेत. 5G तंत्रज्ञान ऊर्जा सक्षमता, स्पेक्ट्रम सक्षमता आणि नेटवर्क सक्षमताही वाढवेल.

सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार  आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी, भारती एअरटेलचे प्रमुख सुनील भारती मित्तल आणि व्होडाफोन इंडियाचे कुमार मंगलम बिर्ला हे उपस्थित राहणार आहेत.
 
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) देशात चार ठिकाणी ५जी सेवेची यशस्वी चाचण केली आहे. या सेवेस प्रारंभ झाल्यानंतर नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरू मेट्रो, कांडला बंदर आणि भोपाळमधील स्मार्ट सिटी क्षेत्रात सेवा सुरू केली जाऊ शकते.
 
रिलायन्स आणि एअरटेलनेही ऑक्टोबरमध्ये ५जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रिलायन्सने दिवाळीदरम्यान देशातील प्रमुख शहरांमध्ये ५जी आणि २०२३ च्या अखेरीस देशातील सर्व मोठ्या आणि लहान शहरांमध्ये ५जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. एअरटेलने ५जी च्या यशस्वी चाचण्या देखील केल्या असून ऑक्टोबरमध्ये ५जी सेवेस प्रारंभ होणार आहे.