काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार

मल्लिकार्जुन खर्गे यांना दिग्विजय सिंह यांचा पाठींबा

गेहलोतांपाठोपाठ दिग्विजय सिंह यांचीदेखील माघार!

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तत्पूर्वी दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये या पदासाठी थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. निवडणूक लढवण्याऐवजी आपण मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थन करणार असल्याचे दिग्विजय यांनी स्पष्ट केले आहे. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आहे आणि करत राहीन, त्यामुळे खर्गे यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करू शकत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यादरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ म्हणाले की, दिग्विजय सिंह यांनी सकाळी फोन करून फॉर्म भरणार नसल्याचे सांगितले होते. तर, याआधीच काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी दिग्विजय सिंह आणि शशी थरूर हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले आहे. तसेच कदाचित मल्लिकार्जुन खर्गेदेखील उमेदवारी अर्ज दाखल करू शकतील असे विधान केले होते. मात्र, आता स्वतः दिग्विजय सिंह यांनीच अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल न करण्याची घोषणा केली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा ३० सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. या पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून, १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.