महाराष्ट्राच्या ‘स्थानिक स्वराज्य संस्थां’च्या निवडणुका लांबणीवर पडणार! सुप्रीम कोर्टाची सुनावणी टळली

राज्यातल्या बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत

नवी दिल्ली ,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी लांबणीवर पडली आहे. 92 नगरपरिषदांमधील ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना याबाबत आज कोर्टात निर्णय झाला नाही, तसंच मुंबई महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा विषयही लांबणीवर पडला आहे.

आज सुप्रीम कोर्टात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण याशिवाय मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग रचनेची सुनावणी होणार होती. यासंदर्भातल्या जवळपास 28 याचिका सूचीबद्ध करण्यात आल्या होत्या, मात्र या याचिकांवर आज सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकांवर आता दसऱ्यानंतर सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडणार होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकासआघाडी सरकारने घेतलेल्या प्रभाग संख्येनुसार होणार, का शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या प्रभाग संख्येनुसार होणार, यावर या याचिकेमध्ये निर्णय होणार आहे.

राज्यातल्या बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. कोरोना महामारीमुळे या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. महाराष्ट्रातल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे मिनी विधानसभा निवडणूक म्हणून बघितलं जातं. राज्यात मागच्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या सत्तानाट्यामुळे या निवडणुकांना आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकींमध्ये शिवसेना कुणाची तसंच धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.