राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणीला तारीख पे तारीख ; आता थेट एक महिन्यानंतर सुनावणी

नवी दिल्ली ,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष काही थांबण्याचे नाव घेत नाहीये, रोज नव्याने यामध्ये अपडेट्स आणि घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आणखी एक वृत्त समोर येत आहे. राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरू आहे. आता या सुनावणीची पुढील तारीख दिवाळीनंतर म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी आहे. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी घेऊन भारतीय निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हावर निर्णय घेण्याची परवानगी दिली. परंतु इतर अनेक मुद्द्यांवरची याचिका अद्याप प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाशी संबंधित दहा मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात न्यायालयीन कामकाजात अनेक सुट्या असतात. नऊ दिवसांच्या नवरात्रीच्या सुट्यांपाठोपाठ दिवाळीच्या सुट्या आल्याने आता सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुढे सरकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाच्या कामाला आता सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र त्याचवेळी सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यादरम्यान निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यामुळे उद्धव ठाकरे गटातील अस्वस्थता वाढत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.