भगर विषबाधा प्रकरणी औरंगाबादमध्ये आठ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल

औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर व भगरीचें पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अंदाजे दीडशे लोकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. त्यामुळे आता प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या वैजापूर पोलिसांनी ८ किराणा दुकानदारांच्या विरोधात कारवाई करत गुन्हे दाखल केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील सबका मलिक एक या दुकानाचे मालक रमेश गोरक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच घायगाव आणि लोणी बु.येथील अशा एकूण ८ किराणा दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत करण्यात आलेल्या उल्लेखानुसार, वरील सर्व दुकानदारांनी आपल्या दुकानात असलेले भगर आणि पीठ अपचनकारक असल्याचे माहित असतांना सुद्धा ग्राहकांना विकले. नागरिकांनी ते भगर खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर आणि कन्नड तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना भगर खाल्याने विषबाधा झाली आहे. ज्यात वैजापूर तालुक्यातील ११८ गावकऱ्यांना भगरमधून विषबाधा झाली आहे. तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील २५ पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड तालुक्यातील १२ पेक्षा अधिका लोकांना विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.