मोफत रेशन योजना मुदत ३ महिन्यांनी वाढवली

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारने मोफत रेशन देणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत आणखी तीन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरला संपणार होती. मात्र, सरकारने या योजनेला आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजे या वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यांसाठी मोफत रेशनची योजना पुढे वाढवल्यामुळे तिजोरीवर ४५,००० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.केंद्र सरकारने शिल्लक धान्याच्या साठ्याचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या सरकारकडे धान्याचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या अगोदर मोफत रेशनची योजना आता बंद होईल, अशी चर्चा होती.