शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार-विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका
भंडारा,२० सप्टेंबर /प्रतिनिधी :- सततचा पाऊस, अतिवृष्टी व धरणाच्या पाण्यातून झालेल्या विसर्गामुळे आलेला पूर यामुळे शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यातून ते टोकाचं पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली . भंडारा जिल्ह्याच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर असताना ते बोलत होते.कृषिमंत्री हे फक्त घोषणा करतात. सरकारने ३ हजार कोटींची मदत जाहीर केली , प्रत्यक्षात ३ रुपयांची मदतही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला.
पूर्वी फक्त विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वृत्त येत होते, आता विकसित भाग असलेल्या पुण्यातील जुन्नर मध्येही शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे वेदनदायी,दुःखदायी व अपमानजनक आहे. सरकार हे भगवान भरोसे काम करतोय. मुख्यमंत्री त्यांच अभिवचन विसरलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याऐवजी त्या कशा वाढतील हे सरकारचे धोरण आहे का असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
आज भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना दानवे यांनी पवनी रोडवर पंढरीजी भुरले या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन धानपीक नष्ट झालेल्या बुडीत क्षेत्राच्या नुकसानाची पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील आंबाडी गावातील आत्महत्याग्रस्त शेतकरी भीमराव कळंबे,संतोष सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वरपर भेट घेतली.भंडारा पवनी 274 राष्ट्रीय महामार्गाच काम करताना रस्त्याची उंची वाढली, मात्र पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन न केल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला. याची वारंवार स्थानिकांनी तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याची खंत विरोधी पक्षनेते दानवे यांनी व्यक्त केली.यावेळी आमदार दुष्यंत चतुर्वेदी,संपर्कप्रमुख निलेश धुमाळ,जिल्हाप्रमुख नरेश डहारे व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.