राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होण्यासाठी “रन फॉर युनिटी”चे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड

रन फॉर युनिटीमध्ये धावले औरंगाबादकर !

औरंगाबाद,१८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी ‘रन फॉर युनिटी ‘ चे आयोजन केले असून सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला ही आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त्‍ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी उद्घाटन प्रसंगी विभागीय क्रीडा संकुल येथे व्यक्त केले. हैदराबाद  मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  

Image

       

कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ,पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी, विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये  उस्फुर्त सहभागी झाले होते.    

Image

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 13 महिन्यांनी हैदराबाद  स्वतंत्र झाला आणि निजामाच्या राजवटीतून  हैदराबाद  मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील करण्यात आला. एकसंघ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निझामाच्या विरोधात पोलीस ॲक्शन करण्यात आली, “एक भारत, श्रेष्ठ भारत” साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून  देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत . जाती, धर्म, भाषा, हे वेगवेगळे असले तरी एकसंघतेच्या भावनेने  ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन जिल्हा प्रशासनाने आयोजित केल्याबद्दल डॉ.कराड यांनी आभार व्यक्त केले.

या रॅलीचे आयोजन विभागीय क्रीडा संकुला पासून सूतगरणी चौक ते गजानन महाराज मंदिर ,पुन्हा याच मार्गाने   विभागीय क्रीडा संकुल येथे समारोप  करण्यात आला. प्रथम राष्ट्रगीत गायन झाले. त्यानंतर मशाल हातात घेऊन डॉ.भागवत कराड यांनी  ‘रन फॉर युनिटीच्या’ रॅलीत सहभाग घेतला.

Image

अखंडतेचा दिला संदेश 
विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा चौक, गजानन महाराज मंदिर चौक व पुन्हा त्याच मार्गाने दौड विभागीय क्रीडा संकुलात गेल्यानंतर समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी स्वतः या दौडमध्ये सहभाग नोंदविला. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित करण्यात आली. आठ वर्षाच्या मुलापासून ८० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकणार नाही, अशा प्रकारचा संदेश या दौडच्या माध्यमातून दिला.

यशस्वीतेसाठी यांनी घेतला पुढाकार
रन फॉर युनिटी’चे आयोजन यशस्वीरित्या करण्यासाठी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख, मनपा उपायुक्त रवींद्र निकम, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम राऊत, क्रीडा अधिकारी लता लोंढे, मनपा क्रीडा अधिकारी संजय बाल्लया यांच्यासह विविध खात्यातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उद्योजक हर्षवर्धन कराड, डॉक्टर असोसिएशनचे  डॉ. प्रफुल्ल जटाळे, रिलॅक्स झीलचे संजय पाटील, अल्टिमेट जिमचे रिझवान शेख, अॅथलेटिक्स कोच सुरेंद्र मोदी, टीएफआयचे दीपक कोलते, गजानन वाबळे,  आनंद दरक, राहुल डुकरे, अनंत वजंरीनकर, मंगेश तोडेकर आदींनी परिश्रम घेतले. या दौडमध्ये सहभागींना ग्रीन ग्लोब फाऊंडेशन आणि टीएफआयतर्फे सिडबॉल देण्यात आले.

भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे- डॉ. भागवत कराड
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हैदराबाद मुक्ती संग्रामाचा आझादी का अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. सरदार वल्लभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते. त्यावेळेस ५६४ संस्थान या देशांमध्ये होत्या. ५६४  संस्थानला एकत्र करून एक भारत बनवण्याचे काम सरदार वल्लभाई पटेल यांनी केले. त्यावेळेस हैदराबाद हे संस्थान वेगळे होतं. ते अखंड भारतात सामील होत नव्हतं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यावेळी मराठवाडा, तेलंगणा असो की कर्नाटक यांना भारतामध्ये सामील होण्यास भाग पाडले.आपल्या भारतात वेगवेगळ्या जाती, धर्माचे लोक राहत असले, राज्य वेगळे असले, आपली भाषा वेगळी असली तरी आपण सर्वजण एक आहोत, भारतीय आहोत. १७ सप्टेंबर हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. या दिवशी हैदराबाद निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाच्या माध्यमातून ज्या ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांनी जेलमध्ये जाऊन आपल्यासाठी त्याग केला त्यांचे स्मरण या माध्यमातून करायचे आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपणाला एक श्रेष्ठ भारत करायचा आहे. भारताला जगामध्ये विश्वगुरू बनवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन या भारत देशाला पुढे नेण्यासाठी काम करण्याची गरज आहे. ‘रन फॉर युनिटी’ हे एक माध्यम असून सर्वांनी एकसंघ होण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. तसेच असे उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी जाहीर केले. 

यांनी नोंदविला सहभाग 
‘रन फॉर युनिटी’ या उपक्रमात शहरातील ३० शाळा- महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसह सीएमआय, व्यापारी महासंघ, मसिआ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महापालिका, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छावणी परिषद, पोलिस विभाग, आरटीओ, स्काऊट गाईड, एनसीसी, वन विभाग, केंद्रीय माहिती विभाग, औरंगाबाद फर्स्ट, गेट गोइंग, ब्लॅक बक्स, क्रेडाई, डॉक्टर असोसिएशन, सीए असोसिएशन, रोटरी, जायंट्स, लायन्स क्लब, माजी सैनिक विभाग, एनजीओ अशा विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांच्या क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.