मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

Image

औरंगाबाद,१७ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याप्रकारचे मेळावे यापुढेही आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजगाराभिमुख करण्याचा मानस श्री. लोढा यांनी बोलून दाखविला.

मराठवाड्यातील प्रत्येकाला  रोजागाराभिमुख करण्याचा मानस – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दोन दिवसीय प्रधानमंत्री कौशल्य विकास, उद्योजकता, अप्रेंटिसशिप व महारोजगार मेळाव्याचे  उद्घाटन श्री. लोढा यांच्या हस्ते झाले.  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मेळाव्यास सुरूवात झाली. औरंगाबाद येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधींनी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या. याचप्रमाणे या मेळाव्याच्या ठिकाणी स्टार्टअप प्रदर्शन, उद्योजकता मार्गदर्शन आणि करीअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Image

मेळाव्यास केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सर्वश्री आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा, उप सचिव श्रीमती भरोसे, आयुक्त दीपेन्द्र सिंह कुशवाह, संचालक दिगंबर दळवी, उपायुक्त सु.द.सैंदाणे, सहायक आयुक्त सुरेश वराडे आदी उपस्थित होते.

Image

राज्यात आगामी दोन वर्षात पाच लाख उमेदवारांना रोजगार अथवा स्वयंरोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.  कौशल्य पदवी प्रदान सोहळ्यात सर्व मान्यवरांनी पदवी दीक्षांत पोशाख घालून उमेदवारांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले. प्रातिनिधिक स्वरूपात परम स्किल्स यांच्यामार्फत रुचा इंजिनिअरिंग इंड्यूरंस टेक्नॉलॉजी या कंपनीत अप्रेंटीसशिप म्हणून निवड झालेल्या पाच उमेदवारांना मंत्री लोढा यांच्या हस्ते निवड पत्र देण्यात आले.

Image

रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर देऊन विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा डॉ. कराड, आमदार बागडे यांनी व्यक्त केली. मेळाव्याप्रसंगी श्रीमती वर्मा यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कुशवाह यांनी आभार मानले.