पाचवीपासूनच देणार विद्यार्थ्यांना शेतीचे धडे:शिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार

धोरणात्मक निर्णयाची अब्दुल सत्तारांची घोषणा

मुंबई : आता इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शेतीचे धडे देणार असल्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. त्यासाठी शिक्षकांनाही शेतीचे प्रशिक्षण देणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. शेतीत तरुणांना निपुन करण्याच्या उद्देशाने हे धोरण राबवण्यात येणार आहे. मात्र, ही घोषणा अद्याप प्रत्यक्षात उतरलेली नाही.

‘शेतीतले अनेक छोटे मोठे प्रकार असतात. गायींना चारा कसा द्यायचा अशा अनेक गोष्टी असतात. या सर्वाचे प्रशिक्षण लहानपणापासून विद्यार्थ्यांना शिकवल्यास याचे परिणाम भविष्यात चांगले असू शकतात. नोकरी नाही मिळाली तर त्यांना शेतीदेखील करता येत नाही. जर त्याला लहानपणापासून शेती कशी करावी याचे जर शिक्षकांनी ट्रेनिंग दिले तर शिक्षक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देईल. यामध्ये नांगर धरण्यापासून आधुनिक शेतीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे.

शिक्षकांना शेतीचे ट्रेनिंग देण्याची जी रचना आहे हे सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालू. त्यांना हा निर्णय पटला तर ते शिक्षणमंत्र्यांना पुढील कार्यवाहीसाठी निर्देश देतील, असे सत्तार यावेळी म्हणाले. तसेच, यासर्वाचा खर्च कृषी मंत्रालयाने द्यायचा की शिक्षण मंत्रालयाने याची बैठक होईल, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.

पाचवी ते बारावी असे सात वर्ष विद्यार्थ्याला शेतीचे शिक्षण दिले जाईल. याचा भविष्यात फायदा होईल, असे मला वाटते. माझ्या मनात असणे म्हणजे ही गोष्ट फायनल नसते, असेदेखील सत्तार यांनी यावेळी मुद्दामहून नमुद केले. तसेच मी कोणता निर्णय जाहीर केलेला नाही. मी मागणी करत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय काही मिळत नाही. मुख्यमंत्री यांच्यासोबत एकदा चर्चा झाली आहे. याचा प्रस्ताव लवकरच ठेवण्यात येईल. शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार. असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.