मनसे मुंबईसह सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार

मुंबई ,१४ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची मनसे ही भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी करणार का? या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकांमध्ये सर्व जागांवर लढण्याची तयारी सुरु केल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांत भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. तसेच गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे दोनदा एकमेकांना भेटले. त्यामुळे मनसेच्या इंजिनाला दोन नवीन डबे मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र आता मनसेने स्वबळाचा नारा देत भूमिका स्पष्ट केली.राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईत २२७ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.

युती हा जर तरचा विषय आहे. आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. कुठल्याही पक्षाचा बालेकिल्ला नसतो. कार्यकर्त्यांमधे चैतन्य कायम ठेवण्यासाठी पालिका निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. यासोबतच, राज ठाकरेंच्या आदेशानुसार तयारीला सुरुवातदेखील केली असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

तसेच, मनसेचा विदर्भ दौरा सुरू होत आहे. पक्ष वाढीसाठी हा दौरा करण्यात येणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यासोबतच, दसरा मेळाव्यावरुन सुरु असलेल्या वादावरही त्यांनी भाष्य केले. दसरा मेळावा कधी आणि कुठे होतोय हे महत्त्वाचे नाही. बाळासाहेबांचे विचार कोणाकडे आहेत हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांचे विचार फक्त राज ठाकरे मांडतात. त्यामुळे कोणाचा मेळावा कुठे होतो ह्याला फार महत्त्व नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. तेव्हापासून महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे आणि शिंदे गटाची युती होणार असल्याची चर्चा सुरू होती.