आत्मसन्मान रक्षणासाठी १० हजार शिक्षक भर पावसात रस्त्यावर

औरंगाबाद,११ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- शिक्षकांच्या  सर्व संघटनांनी ऐक्याची वज्रमूठ घट्ट करून आज शिक्षक भारती संघटनेने आयोजित केलेल्या आत्मसन्मान मोर्चात सहभाग नोंदवत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली.तब्बल १० हजार शिक्षक भर पावसात चिंब भिजत मोर्चात सहभागी झाले.यात महिला भगिनींनी लक्षणीय सहभाग नोंदवला.मोर्चामुळे आमखास मैदान ते दिल्ली गेट रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

मोर्चाचे नेतृत्व आमदार कपिल पाटील,आमदार विक्रम काळे,आ.सतीश चव्हाण,आ.सुधीर तांबे,नवनाथ गेंड यांनी केले.विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित शिक्षकांशी भ्रमण ध्वनीवरून संवाद साधला.यावेळी बोलताना आमदार महोदयांनी यापुढील लढाई आम्ही योग्य ठिकाणी लढून शिक्षकांना लवकरच चिंतामुक्त करू असे सांगितले.आमदार कपिल पाटील,आ.विक्रम काळे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या भाषणाला कडाडून टाळ्या मिळाल्या.

आमदारांच्या  शिष्टमंडळाने आयुक्तांचे प्रतिनिधी तहसीलदार अरुण पावटे  यांना निवेदन दिले.सूत्र संचालन संतोष ताठे यांनी प्रकाश दाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.आजच्या मोर्चासाठी सहभागी शिक्षक संघटनांचे नवनाथ गेंड,सुभाष महेर,किशोर कदम,दिनेश खोसे,भरत शेलार,विनोद कडवं,स्वाती बेंडबर,शगुफ्ता फारुकी, राजेश भुसारी, सुनील चिपाटे,महेंद्र बारवाल, विठ्ठल बदर,अनिल देशमुख, श्याम राजपूत,सुनील जाधव,भगवान हिवाळे, संजय बुचुडे, गोविंद उगले,इलाजुद्दीन फारुकी, मोईन शेख,मच्छिंद्र भराडे,गणेश पिंपळे,बिजू मारग,राजेश हिवाळे, दीपक पवार, आर.आर.पाटील, संपत साबळे,संजीव बोचरे, मनोज खुटे,अनिल दाणे, अब्दुल रहीम, भीमराव मुंढे,विनोद पवार, प्रशांत नरवाडे,साहेबराव धनराज, अय्युब पटेल,सुनील काळे, विजय ढाकरे,नितीन पवार,धनंजय परदेशी,सुषमा खरे, रोहिणी विद्यासागर, उर्मिला राजपूत,स्वाती गवई,पुष्पा जाधव,सुप्रिया सोसे,शिल्पा निकम, आदींनी परिश्रम घेतले.

या रॅलीस राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचा मुसळधार पावसात  अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आमखास मैदानापासून सुरू झालेल्या रॅलीसाठी हजारो शिक्षक या वेळी शिस्तीत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाली.या वेळी महिला शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून शिक्षक एकजुटीचे दर्शन घडविले.गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांची विविध माध्यमाद्वारे प्रतिमा मलिन करण्याचे कट कारस्थान सुरू असून जनसामान्यांत शिक्षकांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र आखले जात आहे.   त्याचा उद्रेक आज शिक्षक सन्मान रॅलीतून दिसून आला .

आमची समाजात प्रतिष्ठा आहे,आम्हाला आत्मसन्मान आहे, गुणवत्तेचा संबध मुख्यालयाशी  लावून त्या बाबत समाज माध्यमावर शिक्षकांची बदनामी सुरू असून ती थांबवावी अशी तीव्र भावना शिक्षकांची आहे.   

यावेळी विरोधी पक्ष नेते आ. अंबादासजी दानवे यांनी आ. बंब यांच्या भूमिकेचा निषेध करीत सर्व शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पूर्ण सभेला फोनवरून संबोधित करून सांगितले. यावेळी आ. कपिल पाटील, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, आ. सुधीर तांबे यांसह प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून बंब यांचा खरपूस समाचार घेतला.आजच्या भव्य रॅलीचा समारोप विभागीय आयुक्त कार्यालयावर जाहीर सभेत झाला.

आजच्या सन्मान रॅलीतून सरकारला योग्य तो संदेश गेला असून लवकरच सरकारला धोरणात योग्य बदल करावाच लागणार आहे.ज्या समविचारी संघटनेने पाठिंबा व सक्रिय सहभाग नोंदविला त्यामध्ये शिक्षक सेना,जुनी पेन्शन हक्क संघटनादिव्यांग शिक्षक/कर्मचारी संघटनाराष्ट्रवादी शिक्षक संघ,प्रहार शिक्षक संघटनाअखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना,मुप्टा शिक्षक संघटना,शिक्षक समिती,पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद,प्राथमिक शिक्षक संघ,पाटील गट प्राथमिक शिक्षक संघ,थोरात गट महाराष्ट्र शिक्षक संघटना,शिक्षक क्रांती संघटना,म.रा.जुनी पेन्शन संघटनअखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघअखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आदींनी उस्फुर्त सहभाग नोंदवून पाठिंबा दिला