पीएम किसानच्या धर्तीवर राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ आणणार

मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागासोबतच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे.

कृषी विभागाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झालेला असला तरी अर्थसंकल्पात योजनासाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मागील तीन दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली असून सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.