जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार?-मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांचा सवाल

मुंबई : पितृपक्षात बाळासाहेब नक्की खाली असतील आणि आम्ही जिंकू, अशा वल्गना करणा-या किशोरी पेडणेकर यांना जर बाळासाहेबच सर्वकाही करणार असतील, तर मग प्रॉपर्टीचे वारसदार स्वतः नक्की काय करणार? असा सवाल मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.

शिंदे गटाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या भूमिकेचा समाचार घेत खऱ्या अर्थाने शिंदे गटाचा खरा चेहरा समोर आला असल्याचे म्हटले होते. तसेच आता पितृपक्ष सुरू होतोय आणि पितृपक्षात पितर खाली येतात, असे म्हणतात. त्यामुळे बाळासाहेब खाली येतील आणि आम्हीच धनुष्यबाण जिंकू, असे विधान किशोरी पेडणेकर यांनी केले होते. यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी टीकेचा बाण सोडला आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाविषयी एकनाथ शिंदे यांनाच नव्हे तर किशोरी पेडणेकर यांनाही खात्री आहे. आजही जर कै. बाळासाहेबच सर्व काही करणार असतील, तर मग बाळासाहेबांच्या विचारांचे नाहीच, पण प्रॉपर्टीचे वारसदार असलेले स्वतः नक्की काय करणार? शिवसैनिकांच्या हातावर घड्याळ बांधणार!,” अशी खरमरीत टीका करत शालिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून खरपूस समाचार घेतला आहे.