बार्टीमार्फत प्रशिक्षित १४ विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत यशस्वी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या यशाचा वापर देशाच्या हितासाठी करा – मंत्री धनंजय मुंडें यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई (दि. ०७)  : समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत महाराष्ट्र व दिल्ली येथे यूपीएससीची पूर्वतयारी करणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना प्रायोजकत्व देण्यात येते, या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या १४ विद्यार्थ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

‘या सर्व भावी अधिकाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या वाटेवर चालत आपल्या या यशाचा व पदाचा वापर समाज, राज्य व देशाच्या हितासाठी करा याच मनस्वी शुभेच्छा’ अशा शब्दात मुंडे यांनी या सर्व भावी अधिकाऱ्यांना फेसबुक पोस्टद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

अविनाश शिंदे (२२६), नवनाथ माने (५२७), अशीत कांबळे (६५१), करून गरड (६५६), सौरभ व्हटकर (६९५), अभिजित सरकाते (७११), प्रज्ञा खंदारे (७१९), निखिल दुबे (७३३), शशांक माने (७४३), सुमित रामटेके (७४८), शुभम भैसारे (७४९),  वैभव वाघमारे (७७१), संग्राम शिंदे (७८५) आणि अजिंक्य विद्यागर (७८५) अशी यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

समाजकल्याण विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) च्या वतीने यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी महाराष्ट्र व दिल्ली येथील नामांकित कोचिंग क्लासेस मध्ये तयारीसाठी प्रायोजकत्व दिले जाते. या विद्यार्थ्यांपैकी तब्बल १४ विद्यार्थ्यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या यूपीएससी मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले, ही अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. असे मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *