विधानभवन परिसरात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांसाठी समिती गठित

मुंबई ,२५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशन काळात विधानभवन परिसरात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांसाठी समिती गठित करण्यात आली असल्याची घोषणा दोन्ही सभागृहात करण्यात आली.

अधिवेशन काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सदस्यांनी एकमेकांविषयीच्या आदर भावनेला धक्का पोहोचू नये याकरिता शिस्त पाळण्याची तसेच विधानभवन परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्त्व निश्चित करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीमध्ये विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॅा. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री शंभूराज देसाई, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा सदस्य सर्वश्री जयंत पाटील, विजय उर्फ बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, विधानपरिषद सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अनिल परब, अमरनाथ राजूरकर, शशिकांत शिंदे आदी सदस्य असणार आहेत.