मुंबईची सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार

मुंबई : येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा असेल, असा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली.

“मागील काळात आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष असताना आपण पालिकेत मोठी मजल मारली. तेव्हाही आपण महापौर बनवू शकलो असतो. आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊल मागे आलो. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बसेल. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा मिळून या निवडणुकीत आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही”, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून काम करत नसल्याची टीका भाजपाकडून केली जात होती. त्याचा संदर्भ घेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. “आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहीहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

“आशिषजी, तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिला आहात. त्यामुळे ट्वेंटी-ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची हे तुम्हाला माहिती आहे. हा सामना तर तुम्ही जिंकणारच आहात. पण महापालिकेत मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे. तुम्ही फुटबॉलची अनेक मैदानं तयार केली आहेत. त्यामुळे एखादा फुटबॉल मधे आला, तर त्याला किक कशी मारायची, हे तुम्हाला माहिती आहे”, असे फडणवीस म्हणाले.

“मला विश्वास आहे की गेल्या वेळी तुम्ही जो स्ट्राईकरेट दाखवला, तो दुपटीहून अधिक होता. आपण थेट ३५ वरून ८२ वर पोहचलो. आता गेल्यावेळचा रेकॉर्ड आपण मोडला पाहिजे. यावर आपली सगळ्यांची नजर आहे”, असे फडणवीस म्हणाले.