सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हमरस्त्यावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याचा अभिनव प्रयोग कौतुकास्पद – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

लातूर ,२१ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर हमरस्त्यावरले पाणी एकत्र करून ते जमिनीत मुरविण्याचे शास्त्रशुद्ध काम केले आहे ते अधिक मोठ्या प्रमाणावर करावे जेणे करून राज्याला आणि देशाला पथदर्शक होईल असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

लातूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल,अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे , जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री वडगावे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री दुशिंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.सी. शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उमंगचे डॉ. उटगे यांच्यासह विविध विभागाच्या विभाग प्रामुखाची उपस्थिती होती.

राज्यपाल यावेळी म्हणाले, लातूर जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात होते.त्याची प्रक्रिया पण येथे होते हे कौतुकास्पद असून काळा सोयाबीन हा स्वादासाठी आणि प्रोटीनयुक्त असतात. काळा सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा. लातूर जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र कमी आहे ते वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सादरीकरणाद्वारे लातूर जिल्ह्यातील पर्यटन, सिंचन, इतिहासिक स्थळे, पर्जन्यमान, लोकसंख्या आणि जिल्ह्याची एकूण पाणी पातळीची माहिती दिली. यावेळी त्या -त्या विभागाच्या विभाग प्रमुखांनीही विभागाची माहिती दिली.