पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की

मुंबई,१८ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात आज सभागृहात प्रश्नांचा भडीमार केला. त्याची उत्तरे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना देता न आल्याने, शिंदे सरकारच्या कारकिर्दीतील पहिलाच प्रश्न उत्तरासाठी राखून ठेवण्याची नामुष्की शिंदे सरकारवर आली. या प्रश्नाचं उत्तर आता सरकारकडून सोमवारी दिलं जाणार आहे.

अजितदादा पवार यांनी पालघर जिल्ह्यात हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणेसाठी मंजूर अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे, भरण्यात आलेली पदे, रिक्त पदांची संख्या, हत्तीरोग प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मंजूर निधी, मागील वर्षात खर्च झालेला निधी याबाबत सरकारला प्रश्न विचारले. ही माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे नसल्याने त्यांना उत्तर देता आले नाही आणि उत्तर सोमवारपर्यंत राखून ठेवण्यात आले. शिंदे सरकारला विचारलेला पहिलाच प्रश्न राखून ठेवावा लागणे, ही नामुष्कीची गोष्ट आहे.

May be an image of 1 person and text that says "राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२२ विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांच्या पहिल्याच प्रश्नापुढे शिंदे सरकार निष्प्रभ पालघर जिल्ह्यातील हतीरोग प्रादुर्भावासंदर्भात आरोग्यमंत्र्यांकडे परिपूर्ण माहिती नसल्याने प्रश्न राखून ठेवण्याची सरकारवर नामुष्की f NcpSpeaks"

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाच्या प्रादुर्भावाचा प्रश्न गंभीर असून ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातल्या ८० बालकांना रोगाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील २९ बालकांना या रोगाची लागण झाली आहे. यासंदर्भात प्रश्न विचारताना अजितदादा पवार म्हणाले की, हत्तीरोग गंभीर असून त्यामुळे शरीर विद्रुप व अकार्यक्षम होते. लागण झाल्यावर या आजारावर परिणामकारक उपचार नाहीत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. याकडे लक्ष वेधून अजितदादांनी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्षम होण्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना याबाबत उत्तरे देता आली नाहीत.