राऊतांची कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली

मुंबई ,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. त्यानंतर आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते.

राऊतांनी जमीन खरेदीसाठी ३ कोटी वापरल्याचा ईडीचा आरोप

प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊतांच्या खात्यावर १ कोटी ६० लाख जमा झाल्याचा ईडीचा आरोप. यातून अलिबागमध्ये प्लॉट घेतल्याचा दावा केला आहे. प्रवीण हा संजय राऊतांचा ‘फ्रंटमॅन’ असल्याचा आरोप करत १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर ईडीकडून ठपका ठेवण्यात आला आहे.

हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे १०३४ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची ९ कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची २ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.