राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी

नवी दिल्ली,३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी तर शिंदे गटाकडून हरीश साळवे आणि नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील आजचा युक्तिवाद पूर्ण झाला असून गुरुवारी (४ ऑगस्ट) सकाळी हे पहिल्या क्रमांकाचे प्रकरण असेल, असे सरन्यायाधीश रमण्णा यांनी सांगितले.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवरुन सुरु झालेली कायदेशीर लढाई आता शिवसेना कोणाची यावर येऊन पोहोचली आहे. आजच्या सुनावणीत मूळ पक्ष कोणता, आमदारांची अपात्रता यावर युक्तिवाद झाला. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठाकडे या प्रकरणाची सुनावणी झाली.

सत्तासंघर्षाची सुनावणी विस्तारित पीठाकडे की, घटनापीठाकडे जाणार? किंवा निवडणूक आयोगाच्या नोटिशीला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आता गुरुवारीच्या सुनावणीत मिळेल, अशी आशा आहे.