उदय सामंत यांच्या कारवर हल्ला; ‘शिवसंवाद’ सभेच्या आयोजकांसह ५ अटकेत

शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही- उदय सामंत

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या कारवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्रभर भारती विद्यापीठ पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड केली असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ सभेच्या आयोजकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची कात्रजमध्ये ‘शिवसंवाद’ यात्रा आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील पुणे दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार होते. त्यांच्या आधीच उदय सामंत हे मंदिरात जात असताना काही जणांच्या जमावाने उदय सामंत यांच्या कारवर हल्ला केला. यावेळी गद्दार.. गद्दारच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात सामंत यांच्या कारची काच फुटली. या हल्ला प्रकरणी मुख्य आयोजक संभाजी थोरवे, राजेश पळसकर, चंदन साळुंके, सूरज लोखंडे, रुपेश पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर, पंधरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर गाडीवर दगड मारुन पळून जाणे ही मर्दुमगी नाही. कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. त्यामुळे ज्यांनी हे केले आहे त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलीस करतील असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कारवाईचे आदेश दिले.

शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही- उदय सामंत

मुंबई : पुण्यातल्या कात्रजमध्ये शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी हल्ला करण्यात आला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेने ते जात असताना शिवसैनिकांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या घटनेत सामंत यांच्या गाडीतील एक जण जखमी झाला असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता तरी आम्ही शांत असून, आता मात्र आमचा अंत पाहू नका” असा इशारा सामंतांनी शिवसेनेला दिला आहे.

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना ते पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार होते. यासाठी उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी सामंतांच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाडीतील एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर सामंत यांनी ट्विट करुन या हल्लाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, “गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र”

दुसऱ्या एका ट्विटमध्ये सामंत यांनी म्हटले आहे की, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यात असताना माझ्यावर काही व्यक्तींकडून भ्याड हल्ला करण्यात आला. वैचारिक मतभेत असू शकतात मात्र,अशाप्रकारे हल्ले करणे ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती-संस्कार नाही. अशा भ्याड हल्ल्याला मी भीक घालत नाही आणि मी थांबणार ही नाही.

गाडीवर दगड मारुन पळून जाणे ही मर्दानगी नाही. कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे काम सरकारचे आणि पोलिसांचे आहे. त्यामुळे ज्यांनी हे केले त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम पोलिस करतील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.