कर नाही तर डर कशाला; मुख्यमंत्री शिंदेंचे राऊतांवर लगावला टोला

औरंगाबाद,३१ जुलै /प्रतिनिधी :- कर नाही तर डर कशाला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर दिली आहे. ईडीच्या कारवाईच्या भीतीने कोणीही येत असेल तर येऊ नका. भाजपकडे नाही आणि आमच्याकडेही नाही. अर्जुन खोतकर असो की आणखी कोणी. कोणीही असे पुण्याचं काम करू नका, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

औरंगाबादच्या आढावा बैठकीसाठी आले असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊतांवरील कारवाईवर सूचक वक्तव्य केले. कुणावरही सुडाने कारवाई केली असती तर न्यायालयाने संबंधितांची मुक्तता केली असती. ईडीच्या कारवाईमुळे किंवा कुणाच्या दाबावाखाली आलो असे आमच्यातील एकातरी आमदाराने सांगितले का? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईडीच्या कारवाईची भीती दाखवण्याच्या आरोपावर उत्तर दिले. प्रकल्प विकासाच्या कारवाईवर आमचे लक्ष आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पावसामुळे मराठावाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्याचे आमचे ध्येय आहे. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी दुष्काळी भागात वळण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.