“हर घर तिरंगा अभियानात सहभाग घ्या”; ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन

प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा! १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट ‘हर घर तिरंगा’ अभियान

नवी दिल्ली,३१ जुलै /प्रतिनिधी :- भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणार आहे. आपण सगळे या अत्यंत अद्भुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने आपल्याला हे खूप मोठे सौभाग्य दिले आहे. अशी भावना व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत, १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा – हर घर तिरंगा” चे आयोजन केले जाणार असून या मोहिमेत सर्वांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज जरूर फडकवा असे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ च्या ९१ व्या भागातून रविवारी जनतेशी संवाद साधला. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात होत असलेल्या या सगळ्या कार्यक्रमांमागचा सर्वात मोठा संदेश असून सर्व देशबांधवांनी आपल्या कर्तव्यांचे संपूर्ण निष्ठापूर्वक पालन करावे तरच आपण त्या अगणित स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न पूर्ण करू शकू, त्यांच्या स्वप्नातला भारत घडवू शकू. आपल्यापुढील २५ वर्षांचा हा अमृतकाळ, प्रत्येक देशबांधवांसाठी कर्तव्यकाळ असणार आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.

शहीद उद्यम सिंह यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान म्हणाले, “आजच्या दिवशी आपण सर्व देशवासी, शहीद उद्यम सिंह यांच्या हौतात्म्याला नमन करतो. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या इतर सर्व महान क्रांतिकारकांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवाला जनआंदोलनाचे स्वरूप मिळाल्याचे बघून मला आनंद होत आहे. समाजातील सर्व स्तरातील आणि समाजातील प्रत्येक घटकातील लोक या महोत्सवाशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. स्वातंत्र्याच्या संघर्षात भारतीय रेल्वेचे योगदान सगळ्यांना कळावे यासाठी आझादीची रेल्वे आणि रेल्वे स्टेशन नावाच उपक्रम केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे.

झारखंडचे गोमो जंक्शनचे आता नेताजी सुभाषचंद्र बोस जंक्शन गोमो मध्ये नामांतरण करण्यात आले आहे. या स्थानकावर कालका मेलमध्ये चढून ब्रिटिश अधिकाऱ्यांना चकमा देण्यात नेताजी सुभाष यशस्वी झाले होते. देशभरातील २४ राज्यांमध्ये अशा ७५ रेल्वे स्थानकांची ओळख पटली आहे. या ७५ स्थानकांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आली असून यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत.

विद्यार्थ्यांना शुभेच्छा

देशभरात १० वी आणि १२ वीतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मोदींनी अभिनंदन केले. ज्यांनी आपल्या परिश्रम आणि समर्पणाने यश संपादन केले आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या.

पीव्ही सिंधू, नीरज चोप्राला शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे कौतुक करताना पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्रा अभिनंदन केले आहे. या महिन्यात पीव्ही सिंधूने सिंगापूर ओपनचे पहिले विजेतेपद पटकावले आहे. नीरज चोप्रानेही आपली उत्कृष्ट कामगिरीसह जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी रौप्य पदक पटकावले. आमचा अॅथेलीट सूरजने ग्रीको-रोमन स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेत त्याने भारताला कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले. खेळाडूंसाठी हा संपूर्ण महिना कर्तृत्व गाजवणारा ठरला असल्याचे म्हणत मोदींनी भारतीय खेळाडूंचे कौतुक केले आहे.

मध उत्पादनात भारत अग्रेसर

आपल्या पारंपरिक आरोग्य शास्त्रात मधाला किती महत्त्व दिले जाते. मध उत्पादनात इतक्या शक्यता आहेत की शिक्षण घेणारे तरुणही यातूनच आपला स्वयंरोजगार बनवत आहेत. तरुणांच्या मेहनतीमुळे आज देश इतका मोठा मध उत्पादक बनत आहे. देशातून मधाची निर्यातही वाढली आहे.