हर्सूल तलाव १४ वर्षांनंतर भरला , खाम नदीकाठच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद –
जुन्या औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारा हर्सूल तलाव गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भरला आहे. या तलावात 26 फुटा पर्यंत पाणी साचले असून येत्या दोन दिवसात हा तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने खाम नदीच्या काठावर वसलेल्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
1956 मध्ये हर्सूल तलावाचे बांधकाम झाले. या तलावातून औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. या तलावावर जुन्या औरंगाबाद शहराची तहान भागवली जाते. आता देखील सुमारे पंधरा वॉर्डांना या तलावातून पाणी पुरवठा केला जातो. हा तलाव आता पूरण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे. तलावाची पाणी साठवण्याची क्षमता 28 फुटाची आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत या तलावात साडे पंचेवीस ते सहवीस फुट पाणी जमा झाले होते. जटवाडा भागातून या तलावात पाण्याचा ओघ सुरुच असल्यामुळे येत्या दोन दिवसात हा तलाव भरेल असे मानले जात आहे. यापूर्वी 2006मध्ये हर्सूल तलाव भरला होता , खामनदीवर हा तलाव बांधण्यात आल्यामुळे त्या वर्षी खाम नदीला मोठा पुर आला आणि नदीकाठच्या वसाहतींमध्ये दाणादाण उडाली होती.
दोन दिवसात या तलावातील पाणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने खाम नदीच्या काठावर असलेल्या बिस्मील्ला कॉलनी, दिलरस कॉलनी, हिलाल कॉलनी, आरेफ कॉलनी, बेगमपुरा, बारापुल्ला गेट या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.