राज्यसभेचे १९ सदस्य आठवडाभरासाठी निलंबित

नवी दिल्ली,२७जुलै /प्रतिनिधी :-संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विविध विषयांवरून गदारोळ करणाऱ्या विरोधी पक्षातील १९ राज्यसभा सदस्यांना आठवडाभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. यापूर्वी सोमवारी लोकसभेच्या ४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आज, मंगळवारी राज्यसभेतील १९ सदस्यांवर कारवाई करण्यात आली.

पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधक सातत्याने आंदोलन करीत आहेत. विरोधीपक्ष संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा सरकारचा आरोप आहे. सरकार या मुद्द्यांवर चर्चेपासून पळ काढत असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. राज्यसभेत आज, मंगळवारी कामकाज सुरू होताच विरोधकांनी महागाईवर निषेध नोंदवण्यास सुरुवात केली. सभागृहात घोषणाबाजी करीत विरोधी खासदार वेलच्या अगदी जवळ आले. विरोधी पक्षाच्या खासदारांना सभापतींकडून वारंवार जागेवर बसण्याचा आग्रह केला. परंतु, विरोधी सदस्य ऐकण्यास तयार नसल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करणायत आली.

यावेळी राज्यसभा उपसभापतींनी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार सुष्मिता देव, मौसम नूर, शंतनू सेन, नदीमल हक, अभि रंजन बिस्वास, शांता छेत्री, आणि डोला सेन हे तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार आहेत. तसेच मोहम्मद अब्दुल्ला, ए. ए. रहीम, एल. यादव आणि व्ही. शिवदासन, अबीर रंजन बिस्वास, नदीमुल हक यांना निलंबित केले. राज्यसभेतून आठवडाभरासाठी निलंबित केलेल्या खासदारांपैकी ७ जण हे टीएमसी पक्षाचे आहेत.

यापूर्वी सोमवारी २५ जुलै रोजी लोकसभेत गोंधळ घातल्याबद्दल काँग्रेसच्या ४ खासदारांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये मणिकम टागोर, टीएम प्रतापन, ज्योतिमनी, रम्या हरिदास यांचा समावेश असून त्यांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले.