हा नियतीचा खेळ! केलेल्या कर्माचे फळ!-मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे

अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेने राज ठाकरेंना दगा दिला

मुंबई : कपट कारस्थान करणा-या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे, अशी जळजळीत टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

केलेल्या कर्माची फळे इथेच भोगायची असतात. नियती तिचे चक्र पूर्ण करत असते. जी गोष्ट तुम्ही लोकांसोबत केले तेच आज तुमच्यावर वेळ आली आहे. अमित ठाकरे मोठ्या आजारपणाशी लढत असताना राज ठाकरे व्यस्त होते. तेव्हा शिवसेनेने मनसेचे ६ नगरसेवक फोडण्याचे पाप केले. आज तेच तुमचे आमदार फुटून होत आहे, असा टोला मनसेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे.

जे कर्म असते त्याची फळे इथेच भोगायची असतात. ते तुम्ही भोगत आहात. मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा सर्जिकल स्ट्राईक म्हणून शिवसेना नेते बोंबलत होते. बाळासाहेबांचे नाव वापरू नये म्हणता जेव्हा स्मारकासाठी जागा मागितली तेव्हा बाळासाहेब ठाकरे सर्वांचे होते आता एकट्याचे कसे झाले? मुळात बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. ते महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते होते. त्यांच्यावर कुणाचा मालकी हक्क नाही. सोयीनुसार अर्थ बदलणार का? असा सवाल देशपांडे यांनी केला आहे.

तसेच ‘आपलेच प्रश्न, आपलीच उत्तरं’ अशी आजची मुलाखत होती. हाच पालापाचोळा तुमच्यासोबत अडीच वर्ष घट्ट होता. जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे. बेस्ट सीएमचा सर्व्हे केवळ उद्धव ठाकरेंपुरता केला होता का? तुम्ही घरात बसला म्हणून महाराष्ट्राची वाट लागली. त्याचं कौतुक कसलं करता? असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.