शिंदे गटाला काही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय – जयंतराव पाटील

मुंबई ,२७ जुलै /प्रतिनिधी :- शिंदे गटाला काही तरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केली आहे. शिंदे गटात जाण्याची प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. कुणाला कशाची भीती आहे याची माहिती लोकांना आहे. तुम्ही गावखेड्यात गेलात तर लोक शिंदे गटाबाबत काय चर्चा करत आहेत याची कल्पना येईल, असेही जयंतराव पाटील म्हणाले.

शिवसैनिकांनी कधीच निष्ठा बदलली नाही. सर्व शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. काही लोक इकडे-तिकडे झाले आहेत मात्र खरा शिवसैनिक अजून तळ ठोकून आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोनिया गांधी यांच्या चौकशीत मानवतावादी दृष्टीकोन ठेवायला हवा

सध्या ईडी, सीबीआय, आयटी मार्फत चौकशी होणे हे नित्याचे झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या देशातील मोठ्या नेत्या आहेत. त्यांचे वय पाहता, प्रकृती पाहता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायला हवी होती. राजकारण होत राहील मात्र मानवतावादी दृष्टिकोन ठेवायला पाहिजे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षात कोणतीही गळती नाही

माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे शासन आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे कामे घेऊन जात असतात. त्यात गैर काहीच नाही. आपल्या साखर कारखान्याच्या प्रश्नाविषयी बबन शिंदे हे उपमुख्यमंत्र्यांना भेटले. तशी त्यांनी पक्षाला कल्पनाही दिली, असे जयंतराव पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्याला अपंग करुन सोडलंय – जयंतराव पाटील

गुवाहाटीतील वास्तव्य आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत आणि दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केला.

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार का करत नाहीत हे कळायला मार्ग नाही. ज्याअर्थी करत नाहीत त्याअर्थी त्यांच्यात मतभेद आहेत. जे लोक जीवाभावाची शिवसेना सोडून गेले आहेत ते फलप्राप्ती झाल्याशिवाय गप्प बसतील असं वाटत नाही. त्यामुळे मतभेदाची जास्त शक्यता आहे, असेही जयंतराव पाटील म्हणाले.

या राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी आज वाढायला लागले आहेत. राज्यात पूर परिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. पूरग्रस्त भागात पालकमंत्री नाहीत महाराष्ट्रात फक्त दोन मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत. परंतु त्यांच्यातील गुंता सोडवण्यातच त्यांचा जास्त काळ जात आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात पूर परिस्थिती असल्याने जनता हवालदिल झाली आहे. हे लोक पावसाळा संपेपर्यंत थांबले असते तर आमचे आघाडीतील मंत्री पूरग्रस्त भागात ठाण मांडून बसले असते आणि फार मोठी मदत लोकांना झाली असती. महाराष्ट्रात मंत्री नसल्याने जिल्ह्या-जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली आहे आणि हीच अवस्था लोकांना चिंता करायला लावणारी आहे, असेही ते म्हणाले.