उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य महोत्सवास राज्यात उत्साहाने सुरुवात

मुंबई ,२७ जुलै /प्रतिनिधी :- भारत सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागांतर्गत ‘उज्ज्वल भारत, उज्ज्वल भविष्य’ पॉवर@2047 या अभिनव संकल्पनेअंतर्गत देशातील 773 जिल्ह्यात ऊर्जास्त्रोतांचा महोत्सव म्हणजे ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांतून या महोत्सावस सोमवार दि. 25 जुलै 2022 रोजी उत्साहाने सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यात महावितरणच्या सर्व 44 मंडलातील कार्यक्षेत्रात दोन  विविध ठिकाणी केंद्र शासनाने निर्देशिलेल्याप्रमाणे काल दि.25 जुलै रोजी या महोत्सवास नागपूर, अकोला, गोंदिया, जळगाव, नंदुरबार, तळोदा व  यवतमाळ येथे सुरुवात झाली असून केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विषयक योजनेचे योगदान आणि त्याचा सर्वसामान्यांना मिळणारा फायदा व याची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्दिष्टाने पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 ते 30 जुलैपर्यंत होणाऱ्या या महोत्सवात दि. 30 जुलै रोजी मा.पंतप्रधान हे देशातील 100 जिल्ह्यातील  लाभार्थ्यांसोबत थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधणार असून महाराष्ट्रातील  गडचिरोली, वर्धा, नंदुरबार, नाशिक व  कोल्हापूर या जिल्ह्यातील लाभार्थी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

महावितरणच्या कल्याण परिमंडलातील शहापूर येथे गुरुवार दि. 28 जुलै रोजी दुपारी 4 वाजता तसेच शुक्रवार दि. 29 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वाजता मुरबाड येथे होणाऱ्या या महोत्सवास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना. श्री कपिल पाटील, खासदार श्री राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी श्री राजेश नार्व्हेकर यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील दिक्षाभूमी येथे होणाऱ्या महोत्सवास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. श्री. नितीन गडकरी व खासदार कृपाल तुमाने उपस्थित राहणार आहेत.

महावितरणचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथे बुधवार दि. 27 जुलै 2022 रोजी दुपारी 3 वाजता या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे  प्रधान सचिव (ऊर्जा) तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री दिनेश वाघमारे तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  श्री संजय खंदारे उपस्थित राहणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री  विजय सिंघल हे उपस्थित राहतील.

या महोत्सवात राज्यातील 36 जिल्ह्यांत महावितरणने राबविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना, दिन दयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, विलासराव देशमूख अभय योजना, अटल सौर कृषीपंप योजना, कृषिपंप वीजजोडणी धोरण- 2020, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, सोलर रुफ़ टॉप योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, उच्च दाब वितरण प्रणाली, सौभाग्य योजना यांसारख्या व तत्सम योजनांची माहिती देण्यात येत असून, या योजनांच्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अनुभवातून इतरही ग्राहकांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्याशी सुसंवाद साधण्यात येणार आहे. जिल्हावार होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये निवडक लाभार्थ्यांना समाविष्ट करुन त्यांचा यथोचित सन्मान देखील करण्यात येणार आहे.