जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले:नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन
- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलपूजन
- 9 हजार 432 क्यूसेकने विसर्ग सुरु
- धरणाचा पाणी साठा 90 टक्क्याच्यावर
औरंगाबाद,२५ जुलै /प्रतिनिधी :- पैठण जायकवाडी धरणाचा (नाथ सागर जलाशय) पाणीसाठा 90 टक्क्याच्यावर पोहचत असल्याने आज सायंकाळी साडे सहा वाजता धरणाची 18 दरवाजे अर्धा फुटाने उचलत नऊ हजार 432 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते जलाशयाचे विधिवत पूजन झाले, त्यानंतर त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात वक्र दरवाजाचे बटन दाबून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू केला आहे. यावेळी तहसीलदार दत्तात्रेय निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांची उपस्थिती होती.
सध्या जायकवाडी धरणात 36 हजार क्यूसेक्स यावेगाने पाणी दाखल होत आहे.सध्या धरणाचा पाणी साठा 90 टक्क्यांहून अधिक झाला आहे. सोडण्यात आलेला विसर्ग मोठ्याप्रमाणात असल्याने नदी पात्र दुथडी भरुन वाहात आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यावेळी नागरिकांना केले.
जलाशय पाणीपातळी= 463.345 मी.
जीवंत साठा= 1954.356 दलघमी.
जीवंत साठा टक्केवारी= 90.02%
जायकवाडी प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता आज दि. 25-07-2022 रोजी 4 वाजता जीवंत साठा टक्केवारी = 90.02% एवढी आहे व पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी , नाल्यांद्वारे, जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे (R.O.S) परिचलन सुचीनुसार आवश्यक असणारी पाणी पातळीचे नियमन करावयाचे असल्याने *आज दि. 25/07/22 रोजी ठिक 18:00 वा.* धरणाच्या गेटमधुन/सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये 9432 क्युसेकने पुरपाणी सोडण्यास सुरुवात करण्यात येत आहे. तसेच आवक बघून विसर्ग कमी / जास्त करण्यात येईल.तरि गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच नदीपात्रात कुणीही जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरेढोरे, विद्युत मोटारी तसेच इतर तत्सम साहित्य इत्यादी तात्काळ काढून घेण्याबाबत, तसेच कुठलीही जीवित वा वित्तहानी होणार नाही, याबाबत उक्त गावांना तात्काळ सावधानतेचा इशारा देणे संबधी संबंधीत यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.