वैजापूर तालुक्यात बाजठाण फाटा येथे नवीन साखर कारखाना सुरू होणार ; 30 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते भूमीपूजन

ऊस व मका खरेदी  ; इथेनॉल निर्मिती करणार

जफर ए.खान

वैजापूर,२५ जुलै :- वैजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन तालुक्यात नवीन साखर कारखाना सुरू करण्यात येणार आहे. श्री. स्वामी समर्थ साखर कारखाना लि. असे कारखान्याचे नाव असून पंचगंगा उद्योग समूह संचलित या कारखान्याचे भूमीपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शनिवारी होणार आहे.
वैजापूर तालुक्यातील विनायक साखर कारखाना गेल्या वीस-एकवीस वर्षांपासून बंद पडलेला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. शेजारच्या नाशिक- नगर जिल्ह्यातील कारखान्याकडून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणूक केली जात होती. आ.रमेश पाटील बोरणारे व त्यांचे सहकारी बाबासाहेब पाटील जगताप यांनी या प्रश्नात लक्ष घातले.त्यांच्या प्रयत्नाने पंचगंगा उद्योग समूहातर्फे तालुक्यातील बाजठाण फाटा येथे कारखान्यासाठी 100 एकर जमीन खरेदी करण्यात आली असून कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रभाकर उत्तमराव शिंदे व भावराव गायकवाड हे कारखान्याचे मुख्य प्रवर्तक असून पुढच्या ऑक्टोबर महिन्यात कारखाना सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. 50 हजार मेट्रिक टन क्षमतेचा हा कारखाना उभारण्यात येत असून मोठ्याप्रमाणात इथेनॉल व वीज निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.