कोविड असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांनी खंडपीठात आपली तक्रार दाखल करावी-औरंगाबाद खंडपीठाचे आदेश 

औरंगाबाद, दि. ३१  –  कोविड आणि त्या अनुषंगाने उपाय तसेच उपाययोजनांबाबत तक्रार असलेले रुग्ण, त्यांचे नातेवाईक वा पीडित नागरिक यांनी पत्राद्वारे, इमेलद्वारे किंवा वकिलामार्फत उच्च न्यायालय खंडपीठात आपली तक्रार दाखल करावी. खंडपीठ त्याची दाखल घेऊन योग्य ती कारवाई करेल, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी आज दिले.
 शहरातील कोविड रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्या वृत्तांची दखल घेत खंडपीठाने स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर वेळोवेळी सुनावणी होऊन वेगवेगळे निर्देश देण्यात आले आहेत. या फौजदारी जनहित याचिकेवर ४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र न्या.  टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजताच मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे आणि अमायकस क्युरी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांना कोविड फौजदारी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले.
रुग्णांवरील उपचारात शासकीय अथवा खासगी रुग्णालयांतून होणारी हेळसांड, रुग्ण दाखल करून घेण्यात टाळाटाळ आदी अनेक प्रकारच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत खंडपीठाने, नागरिकांनी पुढील विषयासंदर्भातील तक्रारी थेट उच्च न्यायालयाकडे करावेत, असे आवाहन केले आहे.
यामध्ये १) कॅटेन्मेन्ट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा न होणे, २) स्वस्त धान्य दुकानातून कार्डधारकांना धान्याचा पुरवठा न होणे, ३) कोरोनाग्रस्त किंवा त्यांचे नातेवाईक यांना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी मदत केंद्रच उपलब्ध नसणे, ४ ) रुग्णांना रुग्णालयात दाखल करून करून घेण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी सहकार्य न करणे, ५) जबाबदार अधिकाऱ्यांनी निर्देश देऊनही रुग्णालयाने रुग्णाला दाखल न करून घेणे, ६) दाखल रुग्णांची, त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याची किंवा अशा रुग्णालयांना शासन पुरवीत असलेल्या किंवा रुग्णांनी आणून दिलेल्या औषधांचा, इंजेक्शनचा उपयोग उपचारात न करणे, अशी तक्रार असल्यास.
अशी तक्रार दाखल करताना त्याबरोबर शपथपत्र दाखल करणे आवश्यक आहे. हे शपथपत्र जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक किंवा संबंधित तहसील कोर्टचे उपाधीक्षक किंवा नोटरी यांच्यासमोर तयार करण्यात आलेले असावे.
आज सुनावणीवेळी सुरवातीला खंडपीठाने औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त डॉ. आस्तिककुमार पांण्डेय यांनी अ‍ॅटीजेन्ट तपासणी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता, असे म्हणत आयुक्तांचे विशेष अभिनंदन केले त्यांच्या बरोबरीने महसूल आणि पोलीसदेखील उत्तम काम करत असल्याचे म्हटले. नांदेड जिल्ह्यात कोरोनाची लागण वाढत असल्यामुळे खंडपीठाने यावर चिंता व्यक्त करत, संबधित जिल्हाधिकारी, मनपा आणि पोलीस प्रशासनाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले. .शहरी भागात कोरोना नियंत्रणात यश मिळत असताना ग्रामीण भागात मात्र रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून, यावर तातडीने परिणामकारक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
न्या. टी. व्ही. नलावडे हे न्यायालयीन कामकाजसंदर्भात जालना येथे गेले होते, त्यावेळी त्यांनी रीतसर जिल्ह्याबाहेर पडण्याची परवानगी घेतली होती. जाताना नाक्यावर पोलिसांनी सकाळी अकरा वाजता पासबाबत विचारणा केली,  मात्र तो न पाहता जाण्यास सांगितले.  सायंकाळी परत येताना मात्र कोणी चौकशी केली नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश आणि दिशा-निर्देश यांचे प्रत्येक पातळीवर योग्य पद्धतीने पालन, अंमलबजावणी  होते की नाही याची काळजी घेणेही आवश्यक असून, त्यासाठीही उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली  
काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णालयात  रुग्णाने ऑक्सीजन मिळत नाही, मला ऑक्सीजनची गरज असून तो दिला नाही आणि माझा मृत्यू झाला तर त्याला रुग्णालय जबाबदार राहील असा व्हिडीओ व्हायरल केला. नंतर त्याचा मृत्यू झाला. तसेच आठ दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  या व्हिडीओची खंडपीठाने दखल घेतली. या प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली अशी विचारणा खंडपीठाने मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांच्याकडे केली आहे.  
दरम्यान अमिकस क्युरी ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी पाचोरा येथील कोविड रुग्णालयात एका रुग्णाने गळफास घेतला आहे, ती आत्महत्या नसून घातपात आहे अशी चर्चा गावामध्ये आहे त्यामुळे त्याची चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली. खंडपीठाने मुख्य सरकारी वकीलांना संबधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचे आदेशीत केले. राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड. ज्ञानेश्वर काळे तर मनपाच्या वतीने अ‍ॅड. अंजली वाजपेयी -दुबे काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *