जायकवाडी धरणातील पाणीसाठा 90 टक्के पूर्ण झाल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन

जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याबाबत बैठक

औरंगाबाद, २०जुलै /प्रतिनिधी :-जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा घेतला. धरणातील पाणीसाठा 90 टक्के पूर्ण झाल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी आज दिल्या. जायकवाडी धरणातील आजचा पाणीसाठा 1749 दलघन.मी असून तो 1953 दल घन मी झाल्या नंतरच म्हणजेच 90 टक्के साठा झाल्या नंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच पुढील काही दिवसात धरणात येणारा पाणीसाठा लक्षात घेता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

          या बैठकीत  विजय घोगरे, मुख्य  अभियंता, जयंत गवळी,  श्री. सब्बीनवार ,अधिक्षक अभियंता, कडा, जी.एच. पाटोळे, पी.बी. जाधव, कार्यकारी अभियंता, डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ,बालक कोळी, पोलीस निरिक्षक,(सुरक्षा) यांची उपस्थिती होती.

          पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नदीच्या धोक्याची पाणी पातळी निश्चीत करण्यासाठी ‘बल्यूलाईन मार्किंग’ करण्याचे निर्देश देवून सदरील खर्चास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत श्री. चव्हाण यांनी सांगितले. 

गोदाकाठच्या 1522 गावांना इशारा…

मराठवाड्यातील तब्बल 1522 गावे गोदाकाठी वसलेली आहे. त्यामुळे या सर्व गावांना पाणी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता लक्षात घेता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 43 गावे, जालना 178 गावे, परभणी 286 गावे, हिंगोली 70 गावे, नांदेड 337 गावे, बीड 306 गावे, लातूर 158 गावे आणि उस्मानाबादच्या 144 गावांचा समावेश आहे.