शिंदे गटाकडून शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर:उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

शिंदे गटातच्या बैठकीत १४ खासदारांनी लावली ॲानलाईन हजेरी

शिंदेंकडून जूनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त
शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दीपक केसरकर प्रवक्ते तर रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे.

आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. याशिवाय उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अद्याप तरी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखपदाला हात लावलेले नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे.

दरम्यान शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. आता तर खासदार सुद्धा शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची बैठक सुरू असताना शिवसेनेचे १४ खासदार हे ऑनलाईन बैठकीला हजर असल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेचे १९ पैकी १४ खासदार उपस्थितीत असल्याचा मोठा धक्का शिवसेनेला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सामील होणार अशी चर्चा रंगली होती. आज या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

बाळासाहेब असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती : रामदास कदम
रामदास

मुंबई:  माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रात त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर आपल्याला कोणतीही कोणतीही किंमत राहिली नाही. माझा मुलगा व मला वेळोवेळी अपमानित करण्यात आल आहे. मीडिया समोर कधीच जाऊ नका अस सांगण्यात आलं. असे आरोप रामदास कदम यांनी पत्रातून केला आहे.

Image


 
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं
 
प्रति,
सन्माननीय
श्री . उध्दवजी ठाकरे , यांसी
दि . १८.०७.२०२२
 
जय महाराष्ट्र !
शिवसेना प्रमुख मा . बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र , शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही , हे मला पहायला मिळालं . आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही . उलटपक्षी मला व माझा मुलगा आमदार योगेश रामदास कदम याला अनेक वेळा अपमानीत करण्यात आले . विधानसभेच्या निवडणूकीच्या आधी आपण मला आचानक मातोश्रीत बोलवून घेतले आणि मला आदेश दिलेत की यापुढे तुमच्यावरती कोणही कितीही टिका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही . मिडीयासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही , यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकलं नाही . मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे . ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे . २०१ ९ साली आपण राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सरकार बनवत होतात त्याही वेळी मी आपल्याला हात जोडून विनंती केली होती की , शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं . राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका , ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल . अशी आपल्याला विनंती केली होती . पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे . शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती . आणि म्हणून मी आज ” शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे.
 
आपला
(रामदास कदम )