राष्ट्रपती निवडणूक २०२२: निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

राष्ट्रपती निवडणूक २०२२;  निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

मुंबई ,१८ जुलै /प्रतिनिधी :- महाराष्ट्र विधानभवनातील सेंट्रल हॉल येथील मतदान केंद्रात आज राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठीची निवडणूक प्रक्रिया सायंकाळी ५ वाजता पूर्ण झाली. त्यानंतर मतपेटी (बॅलेट बॉक्स) आणि इतर आवश्यक निवडणूकविषयक साहित्य सीलबंद करुन ते सुरक्षेमध्ये वाहनाद्वारे सायंकाळी मुंबई विमानतळाकडे रवाना करण्यात आले. तेथून रात्री ९.५५ वाजताच्या विमानाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतपेटी दिल्लीकडे रवाना होईल.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांच्यामार्फत आज सोमवार दिनांक 18 जुलै 2022 रोजी सेंट्रल हॉल, विधान भवन, मुंबई येथे राष्ट्रपती पदाकरिता मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर सीलबंद मतपेटी आणि इतर निवडणूक साहित्य नवी दिल्ली येथे पाठविण्यात आले आहे.

यावेळी भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक अमित अग्रवाल, भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव एस. बी. जोशी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विधीमंडळाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, विधिमंडळाचे उपसचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रुतुराज कुडतरकर, दोन्ही राजकीय पक्षाकडील पोलींग एजंट आमदार श्रीकांत भारतीय, आमदार डॉ. वजाहत मिर्जा अथर मिर्झा, राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, उपमुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती निवडणूक २०२२;  निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना

महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत, उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ऋतुराज कुडतरकर आणि अवर सचिव सुभाष नलावडे यांनी सदर निवडणूक मतपेटी आणि इतर सीलबंद साहित्य छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून विमानाद्वारे राज्यसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे नेण्यासाठी प्रयाण केले.

राष्ट्रपतीपदासाठीची या निवडणुकीत एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला असून 5 सदस्य आपला मतदानाचा हक्क बजावू शकले नाही. दिवसभर चाललेली ही मतदान प्रक्रिया शांतपणे पार पडली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे.

Image