मृत्यूतून मिळाले जीवनदान

पुणे ,१५ जुलै /प्रतिनिधी :- एका दुर्दैवी घटनेमुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या एका तरुण महिलेला पुणे येथील दक्षिण कमांडच्या कमांड रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयात दाखल करून घेतल्यानंतर तिच्या मेंदूचे कार्य सुरु आहे असे दर्शविणारी कोणतीही लक्षणे तिच्या शरीरात दिसत नव्हती. मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या अवयवदानाच्या संकल्पनेबाबत त्या महिलेच्या कुटुंबियांना माहित होते. रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकांशी चर्चा केल्यानंतर त्या कुटुंबाने अवयवांची अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना तरुण महिलेचे अवयव दान केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली. अवयवदान प्रक्रियेसाठी आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर कमांड रुग्णालयातील प्रत्यारोपण पथक तातडीने कार्यरत झाले आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (झेडटीसीसी) आणि लष्कराच्या अवयव पुनर्प्राप्ती आणि प्रत्यारोपण प्राधिकरण यांना याबद्दल सूचित करण्यात आले.14 जुलै 2022ची रात्र आणि 15 जुलै 2022ची पहाट या काळात त्या महिलेच्या शरीरातील मूत्रपिंडासारखे महत्त्वाचे अवयव भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या दोन जवानांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले तर डोळे, कमांड रुग्णालयातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील नेत्रपेढीत सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आले.त्या महिलेचे यकृत, पुण्याच्या रुबी हॉल दवाखान्यातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.

मरणोत्तर अवयवदानाच्या या परोपकारी कृतीमुळे आणि दक्षिण कमांडच्या कमांड रुग्णालय व्यवस्थापनाच्या समन्वयीत प्रयत्नांमुळे गंभीररित्या आजारी असलेल्या 5 रुग्णांना जीवन आणि दृष्टी मिळाली. अशा घटना  “तुमचे अवयव स्वर्गात घेऊन जाऊ नका, देव जाणतो की आपल्याला त्या अवयवांची या भूतलावर जास्त गरज आहे” या विचाराला अधिक बळ देतात. यातून, अशा परिस्थितीत, गरजू रुग्णांसाठी अवयव दानाची भूमिका किती अनमोल ठरते याविषयी समाजात जागरुकता पसरते.