शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीसाठा 80 टक्क्यांवर पोहोचला

पाण्याची आवक व पाऊस लक्षात घेता एक दरवाजा उघडला

नांदेड ,१२ जुलै /प्रतिनिधी :- शंकरराव  चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात आज  80 टक्के क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. व  बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा एक दरवाजा विसर्ग-377 क्युमेक्स (13313.00 क्युसेस)  दुपारी 2.30 वाजता उघडण्यात आला आहे. 

विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे,‍ जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य,  इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी प्रशासकीय स्तरावरून  नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आली आहे. 

बळेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडले
गोदावरी नदीमध्ये ​पाण्याची आवक ​वाढल्यामुळे व शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आल्यामुळे बळेगाव उच्च पातळी  बंधाऱ्याचे दोन दरवाजे आज दुपारी उघडण्यात आले. बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या / शेतकऱ्यांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.