औरंगाबादेत ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू,१९७ नवे बाधित
औरंगाबाद:
जिल्ह्यातील सहा, तर जळगावातील एका, अशा सात करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या ४६४ झाली आहे. तर, दिवसभरात १९७ बाधितांची भर पडून जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १३,५६६ झाली आहे.
हडको टीव्ही सेंटर परिसरातील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाला १६ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचार सुरू असताना रुग्णाचा मंगळवारी (२८ जुलै) मध्यरात्री दोन वाजता मृत्यू झाला. छावणी परिसरातील गवळीपुरा येथील ७० वर्षीय महिला रुग्णाला २६ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याच दिवशी रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा बुधवारी (२९ जुलै) सकाळी सव्वाआठ वाजता मृत्यू झाला. त्याचवेळी जळगावातील ५० वर्षीय महिला रुग्णाला २४ जुलै रोजी घाटीत दाखळ केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टनुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा २५ जुलै रोजी मृत्यू झाला; परंतु संबंधित रुग्णाच्या मृत्युची माहिती घाटी प्रशासनाने चार दिवसांनी बुधवारी (२९ जुलै) दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी सिल्लोड तालुक्यातील समता नगर, शिक्षक कॉलनीतील ५८ वर्षीय, तर औरंगाबाद शहरातील कैसर कॉलनीतील ५९ वर्षीय, रोशनगेट येथील ७० वर्षीय व फाजलपुऱयातील ४६ वर्षीय चार करोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांत मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत घाटीत ३५०, तर जिल्ह्यात ४६४ बाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 342 जणांना (मनपा 188, ग्रामीण 154) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 9680 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 197 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13566 झाली आहे. आजपर्यंत एकूण 464 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3422 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुपारनंतर 126 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 34, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 55 आढळलेले आहेत.
जिल्ह्यात बुधवारी (२९ जुलै) १९७ नवे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १३,५६६ झाली आहे. त्याचवेळी आतापर्यंत ९,६८० बाधित हे करोनामुक्त झाले आहेत व आतापर्यंत ४६४ बाधितांचा मृत्यू झाला आहे आणि सध्या ३,४२२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच बुधवारी ३४२ करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना सुटी देण्यात आली. यामध्ये शहरातील १८८ व ग्रामीण भागातील १५४ बाधितांचा समावेश आहे.