जोरदार पावसामुळे खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

रायगड, रत्नागिरीमधील काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवर

मुंबई ,४ जुलै /प्रतिनिधी :-रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे.

याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मागील काही तासांपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस झाला. याशिवाय पुढील काही तासांत हा पाऊस आणखी वाढू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.