अँटीजन चाचणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे- उपजिल्हाधिकारी सूत्रावे

औरंगाबाद, दिनांक 29 – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. जेणेकरून बाधीतांचे वेळेत निदान करणे शक्य होईल, तरी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे , असे आवाहन उपजिल्हाधिकारी सरिता सूत्रावे यांनी आज येथे केले.

शहरातील आंबेडकर नगर येथे नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यासाठीच्या पूर्व तयारीच्या पाहणी दरम्यान त्यांनी स्थानिकांसोबत संवाद साधला.नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांंना सहकार्य करावे.प्रामुख्याने शहरातल्या प्रवेश नाक्यांवर करण्यात येत असलेल्या अँटीजन चाचण्या मध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकर नगर येथील नागरिक बाधीत आढळून येत आहे.त्यामूळे कोरोना संसर्गाला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी या भागातील नागरिकांनी अँटीजन चाचणी करण्यासाठी पुढे यावे,असे श्रीमती सुत्रावे म्हणाल्या.

उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, झोन अधिकारी श्री तेंगले ,त्यांच्या पथकाने आंबेडकर नगर येथे भेट देऊन नागरिकांशी चर्चा करून चाचणीची आवश्यकता आणि उपयुक्तता समजावून सांगितली. उद्या आंबेडकर नगर येथील समाज मंदिर, फुलेनगर येथे चाचणी साठी कॅम्पचे आयोजन केले आहे. त्याबाबत सकाळी सहा वाजेपासून सगळीकडे घंटा गाडी ,रिक्षा फिरवून चाचणी बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सगळ्या वॉर्ड मध्ये जवान हे मेगा फोन द्वारे जनजागृती करणार आहेत. ही जनजागृती पूर्ण दिवस करण्याचे नियोजन केलेले आहे जेणे करून जास्तीत जास्त लोकांना सहभाग घेता येईल,असेही श्रीमती सुत्रावे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *