औरंगाबादेत ११ बाधितांचा मृत्यू, ११७ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर
औरंगाबाद:
जिल्ह्यातील ३१ ते ६८ वयोगटातील ९ बाधितांचा, तर गेवराई (जि. बीड) येथील १०० व जालना जिल्ह्यातील ५५ वर्षीय बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या ४५८ झाली आहे. त्याचवेळी मंगळवारी (२८ जुलै) दिवसभरात ११७ बाधित आढळून आल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या १३,३६९ झाली आहे. तसेच आतापर्यंत ९,३३८ बाधित हे करोनामुक्त झाले आहेत व सध्या ३,५७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
शहरातील आंबेडकर नगर येथील ३१ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱया दिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी (२७ जुलै) सकाळी सव्वानऊ वाजता मृत्यू झाला. रोझा बाग परिसरातील ६५ वर्षीय महिला रुग्णाला १४ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा २३ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता मृत्यू झाला. गेवराई (जि. बीड) येथील मोमिनपुरा येथील १०० वर्षीय पुरुष रुग्णाला २३ जुलै रोजी घाटीत दाखल केले होते व रुग्ण बाधित असल्याचे २४ जुलै रोजी स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता मृत्यू झाला. आडगाव (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथील ६० वर्षीय पुरुष रुग्णाला सोमवारी घाटीत दाखल केले होते व त्याचदिवशी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा सोमवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी मृत्यू झाला. परतूर (जि. जालना) येथील ५५ वर्षीय करोनाबधित पुरुष रुगणाचाही मंगळवारी (२८ जुलै) सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. तसेच शहरातील विद्यानगर येथील ३५ वर्षीय करोनाबाधित महिला व राम नगरातील ६८ वर्षीय करोनाबाधित पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचवेळी खोकडपुऱ्यातील ५८ व ४६, अहिल्याबाई पुतळ्याजवळील ७०, रोझाबागमधील ६१ वर्षीय पुरुष करोनाबाधितांचाही खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ३४७, तर जिल्ह्यात ४५८ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.