वैजापूर तालुक्यात अनधिकृतपणे पुतळ्यांची स्थापना कारवाईचे जिल्हाधिकारी चव्हाण यांचे संकेत
वैजापूर ,३० जून /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात राष्ट्रीय महापुरुषांचे बहुतांश ठिकाणी पुतळयाची अनधिकृतपणे स्थापना केली.त्यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी बुधवारी (ता.29) येथे पार पडलेल्या प्रशासकीय कार्यक्रमात तीव्र शब्दात नाराजी नोंदवली.देशासाठी सूर्य प्रकाशात योगदान दिलेल्या कर्तबगार राष्ट्रपुरुष, महामानवाचे पुतळे, स्मारक जिल्हा प्रशासनाची नियमानुसार परवानगी घेऊन स्थापन करण्या ऐवजी रात्रीच्या अंधारात गुपचूप बसवण्याची गैरकृती करणा-या मंडळीवर महसूल व ग्रामीण पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बोलताना दिले.
तहसील कार्यालयाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराजस्व अभियाना अंतर्गत आत्महत्याग्रस्त कुंटुबांना कृषी निविष्ठा, आर्थिक दुर्बल व अपंगाना बीपीएल रेशनकार्ड,राष्ट्रीय कुंटुब साहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान,घरकुल योजनेतील शंभर लाभार्थ्यांना पंधरा हजारा प्रमाणे पहिल्या टप्प्याची रक्कम आनलाईन त्यांच्या बँक खात्यात जमा केली. शेतक-यांना सातबारा वाटप कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.पंचायत समिती सभागृहातील या कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी कैलास जाधव, पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव , पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आत्महत्याग्रस्त कुंटुबातील सदस्यांना तालुका कृषी निविष्ठा विक्रेत्यां संघटनेकडून कापूस, मका तूर बियाणे मोफत देण्यात आली. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हयात वृक्ष लागवडीचे प्रमाणावर चिंता व्यक्त केली. वृक्ष लागवड कार्यक्रमा नंतर त्यांचे संवर्धन होणे तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जुने पाणवठे परिसराची स्वच्छता करुन ते पुन्हा वापरता येतील यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करा.शासनाच्या कल्याणकारी योजना लोकापर्यत पोहचवण्यासाठी सामाजिक कार्याची आवड असलेल्या नागरिकांनी संपर्काचे माध्यम होऊन त्यांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नगरपलिका क्षेत्रात वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले.सार्वजनिक स्वच्छता,कच-यांचे वर्गीकरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या यंत्रणेला दिली .वैजापूर तालुक्यात गावोगावी राष्ट्र पुरुषांचे पुतळे अनाधिकृतपणे बसवण्याच्या प्रकारावर त्यांनी बोलताना लक्ष केंद्रित केले होते .राष्ट्र पुरुषांचे पुतळे रात्रीच्या अंधारात स्थापन केल्यानंतर त्या परिसरातील स स्वच्छता सुरक्षा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले जाते. खेद जनक प्रकार ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार राहुल गायकवाड यांनी शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी प्रशासन आपल्या दारी या संकल्पनेतून हा कार्यक्रम तालुक्यात हाती घेतल्याचे सांगितले. सूत्रसंचलन रईस शेख यांनी केले. कार्यक्रमास तालुका प्रशासनातील विविध विभागाचे प्रमुख तसेच कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.