मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई,२६ जून  /प्रतिनिधी :- सामाजिक समतेचे अग्रदूत, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत असलेला “सामाजिक न्याय दिन” व त्यातील सर्व उपक्रमांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, राजर्षी शाहूंनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक समतेसाठी खर्ची घातले. स्त्रीशिक्षण, वंचिताचे शिक्षण आणि त्यांचे न्याय्य हक्क यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यांनी लोककल्याणकारी अशा अनेक योजना, प्रकल्पांचा पाया घातला. शेती-सिंचन, उद्योग- व्यापार, सहकार या क्षेत्रांना जाणीवपूर्वक चालना दिली. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांच्या या निर्णय – धोरणांचा बहुमोल असा वाटा आहे. राजर्षी शाहूंनी आपल्याला अशा अनेक गोष्टींचा धडा घालून दिला आहे. त्यांची उजळणी करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. यातून आणखी समृद्ध, वैभवशाली महाराष्ट्र उभा करण्यासाठी कटिबद्ध राहुया, हेच राजर्षी शाहूंना अभिवादन. जयंतीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक न्यायाचा क्रांतिकारक विचार दिला. सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सर्वकालीन आदर्श राजे होते. त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून त्या विचारांवरच राज्याची आजही वाटचाल सुरू आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणहार, बहुजनांचे पालनकर्ते होते. आपल्या संस्थानात त्यांनी शेतकरी हिताचे कायदे केले. शेतीसाठी धरणे बांधली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली करुन दिली. त्यांच्यासाठी वसतिगृहे बांधली. उद्योगाला प्रोत्साहन दिले. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. नोकरीमध्ये आरक्षण दिले. महिलांच्या सक्षमीकरणाचे कायदे केले. सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक, लोकराजा होते.  राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीच्या विचारांमुळे त्यांचे विचार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत.