शेतीच्या वादातून बहिणीस अंगावर डिझेल टाकून जाळण्याचा भावाचा प्रयत्न

वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव येथील घटना

वैजापूर ,२५ जून  /प्रतिनिधी :-शेतीच्या वादातुन बहिणीस भावाने अंगावर डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना वैजापूर तालुक्यातील माळीघोगरगाव  येथे घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध जीवे मारणे व दंगलीच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
सलमा अनिसोद्दिन सय्यद व सिकंदर सय्यदलाल तांबोळी यांच्यात शेतीच्या मालकीवरुन वाद आहे आणि हा वाद न्यायप्रविष्ट आहे. 22 जून रोजी सलमा सय्यद या शेत गट क्रमांक 178 मध्ये कपाशी लावण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांचा भाऊ सिकंदर तांबोळी, त्यांचा मुलगा रियाज सिकंदर तांबोळी व पत्नी उमराव बेगम सिकंदर तांबोळी यांनी त्यांना शिविगाळ व धक्काबुक्की केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. इलियास सय्यद अली तांबोळी याने पाच लिटर डिझेल आणले व ट्रॅक्टर बंद करा असे म्हणत ट्रॅक्टरला डिझेल टाकले. त्यानंतर सलमा सय्यद यांना त्यांच्या भावाची पत्नी सजमा तांबोळी व उमराव बेगम यांनी पकडले व भावाचा मुलगा नाजिम याने अंगावर डिझेल ओतून पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला असे तक्रारीत म्हंटले आहे. त्यावरुन सिकंदर, रियाज, उमराव, इलियास, सजमा व नाजिम (सर्व रा. माळीघोगरगाव) यांच्याविरुद्ध विरगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.